चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करत,पतीने केली आत्महत्या; चाळीसगाव तालुक्यातील घटना..

चाळीसगाव-
चाळीसगाव तालुक्यातील हातगाव येथे पतीने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन तिचा गळा आवळून खून केला आणि नंतर स्वतः आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना सोमवार (दि.2) रोजी उघडकीस आली असून, चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विजय सुकदेव चव्हाणके (वय ४५) हा पत्नी वर्षा, आई आणि भावासह हातगाव येथील शेतात राहत होता. दोन वर्षांपूर्वी झालेल्या अपघातानंतर विजयचे मानसिक संतुलन बिघडले होते. त्यामुळे तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. सोमवार (दि.2) रोजी विजयने मोठ्या भावाला, अशोक चव्हाणके यांना फोन करून पत्नीला ठार केल्याचे सांगितले आणि स्वतः जीवनयात्रा संपववण्याचा इशारा दिला. हे ऐकताच अशोक चव्हाणके कुटुंबीयांसह शेतात धावले असता, विजय आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तर, पत्नी वर्षा हिचा मृतदेह गुरांच्या चाऱ्यामध्ये आढळून आला. तिच्या गळ्याभोवती सुती दोरी गुंडाळलेली होती. या घटनेबाबत अशोक चव्हाणके यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून, विजयने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत खून केला आणि नंतर जीवनयात्रा संपवल्याचे त्यांनी सांगितले. या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल पवार करत आहेत.
