सोलर पंपामुळे कापूस शेतीला मिळाली संजीवनी तरूण शेतकऱ्यास मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ठरली आधार

जळगाव सोलर पंपामुळे कापूस शेतीला मिळाली संजीवनी तरूण शेतकऱ्यास मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ठरली आधार
घरची वडिलोपार्जित ४ एकर जमीन…पाण्याची चोवीस तास मुबलकता ; मात्र वीजेच्या अनियमितेमुळे शेती करणे कष्टप्रद… अशातच शासनाच्या मुख्यमंत्री सौर पंप योजनेचा लाभ मिळाला आणि कापूस शेतीला संजीवनी मिळाली असून कापसाच्या शेतात बसविलेल्या सौर संचामुळे 4 एकर शेती बहरून आली.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील गाळण येथील उच्च पदवीधारक तरूण शेतकरी नितीन गोसावी यांनी एका वृत्तापत्रात आलेली बातमी वाचून शासनाच्या मुख्यमंत्री सौर पंप योजनेत अर्ज केला. या योजनेत त्यांची निवड होऊन त्यांच्या शेतात तीन अश्व शक्तीचा कृषी सोलर वॉटर पंप बसविण्यात आला. सोलर पंप बसण्यापूर्वी कापूस शेती करतांना कसरत करावी लागत होती. वीजेच्या अनियमितेमुळे कापसाला पाणी देतांना तारांबळ होत होती. कधी कधी तांत्रिक कारणांमुळे आठ-दहा दिवस विद्युतपुरवठा खंडित झाल्याने मोठे नुकसान व्हायचे. आता मात्र ४ एकर कापूस शेताला सोलर पंपाद्वारे पाणी देणे सोयीचे, सहज साध्य होत आहे. त्यामुळे कापसाची शेती करणे फायद्याचे ठरत आहे. असे नितीन गोसावी यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर सोलर पंप दिला जातो. या पंपाची खुल्या बाजारात साधारणत: दोन लाख रूपये किंमत आहे. नितीन गोसावी यांनी यासाठी १० टक्के रक्कमेचा भरणा केला. त्यातून त्यांना सोलर (सौर) संच मिळाला. रविंद्र एजन्सी लिमिटेड या सोलर कंपनीच्या ह्या संचाला तीन अश्व शक्तीचा पंप जोडण्यात आला. सध्या सकाळी साडेआठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत विनाअडथळा हा पंप सुरू आहे. सध्या दिवसाला दीड एकर कापसाच्या क्षेत्राचे सिंचन होते. सोलर पंप संच मिळवून देण्यासाठी नितीनला महावितरण तसेच महाऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांची मदत झाली.
नितीन स्वत: उच्च विद्याविभुषीत आहे. शिरसोली येथे बी.एड (इंग्रजी) च्या शेवटच्या वर्षाचे तो शिक्षण घेत आहे. पाच वर्षापूर्वी त्याच्या वडिलांचे अकाली निधन झाले. घरी आजी, आई, व मोठा भाऊ असा परिवार आहे. मोठा भाऊ नोकरी करत असल्यामुळे संपूर्ण शेतीची जबाबदारी नितीन वर आहे. शेतीच्या कामात भाऊ व आईचे त्याला नेहमी मार्गदर्शन मिळत आहे.