२६ मे रोजी होणार दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रांचे वाटप..

जळगाव-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिपत्याखालील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल १३ मे २०२५ रोजी ऑनलाइन जाहीर करण्यात आला होता.
त्यानंतर परीक्षेच्या गुणपत्रिका व तपशिलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप विभागीय मंडळांमार्फत सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांना सोमवारी, दिनांक २६ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता वितरित करण्यात येणार आहे. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमार्फत गुणपत्रकांचे वाटप करण्यात येणार आहे.
याबाबत विभागीय मंडळांनी सर्व माध्यमिक शाळांना सूचना दिल्या असून, संबंधित मुख्याध्यापक, विद्यार्थी आणि पालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.