उबाठा नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांचे नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन,पाचोरा शहर भागातील रस्ते तातडीने दुरुस्त करण्याची केली मागणी
पाचोरा-
सद्यस्थितीत पाचोरा शहरातील व शहराला जोडणाऱ्या रस्त्यांवर खड्डे पडलेले असून या खड्ड्यांकडे पाचोरा नगरपरिषद प्रशासन व लोकप्रतिनिधींचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने आता उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी याची दखल घेत येणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर या खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
कारण रस्ते सुरक्षितता हा जीवन मरणाचा प्रश्न आहे, आपला प्रवास सुखाचा होवो असे विविध घोषवाक्य लिहिलेल्या रस्त्यावर जेव्हा मोठमोठे खड्डे पडलेले दिसतात व याच खड्ड्यांमुळे दररोज अपघात होऊन कुणाला दवाखान्यात पैसा खर्च करावा लागत आहे. तर कुणाला अपंगत्व येते तर कुणाला आपला जीव गमवावा लागत आहे. तरीही सत्ताधारी हे डोळे असून आंधळे बनले आहेत की काय असा प्रश्न उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी उपस्थित केला आहे.
तसेच उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी या सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी होणारा खेळ थांबवण्यासाठी पाचोरा शहरातील व शहराला जोडणाऱ्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची भविष्यात येणाऱ्या निवडणुकांच्या अगोदर चांगल्या दर्जाचे काम करुन रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवण्यात यावेत व ही रस्त्यांची दुस्तीची कामे करतांना त्याठिकाणी सदर रस्त्यांचे कामाच्या ठिकाणी शासन निर्णयानुसार डिफॉल्ट लायबलीटी पिरियड असे माहिती फलक लावून त्या माहिती फलकावर होणाऱ्या कामांची विस्तृत माहिती व संबंधित ठेकेदाराचे नाव लावण्यात यावे म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या समोर सर्व माहिती येईल अशी मागणी केली आहे.
कारण या अगोदरही पाचोरा शहरातील व पाचोरा शहराच्या हद्दीत असलेल्या अनेक रस्त्यांची कामे करण्यासाठी कोटी रुपयांचा खर्च करुन कामे करण्यात आली असल्याचे फलक ठिकठिकाणी दिसून येतात. मात्र तरीही या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असून रस्ते बनवल्यानंतर त्यांच्या कालमर्यादेत प्रमाणे रस्त्यांची काम टिकली नसल्याने ते कालमर्यादा संपण्याआधीच कमालीचे खराब झाले आहेत. यामागील कारण या रस्त्यांची कामे सुरु असतांना लोकप्रतिनिधींचे झालेले दुर्लक्ष तसेच रस्त्यांची कामे होत असतांना कामाचा दर्जा मेन्टेन ठेवण्याकडे नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे तसेच मर्जीतील ठेकेदारांनी कामासाठी मंजूर झालेली रक्कम हडप केली असावी म्हणून रस्त्यांची वाट लागली असावी असा संशय व्यक्त केला आहे.
तसेच एकाबाजूला स्वताला स्वयंघोषित कार्यसम्राट ही पदवी चिपकवून घेत विकासाच्या गप्पा मारणाऱ्या विद्यमान आमदारांनी पाचोरा शहरातील व शहराला जोडणाऱ्या रस्त्यांवर उतरुन रस्त्यांची झालेली दुरवस्था पाहाची तसदी घेतली आहे का ? असा प्रश्न आमच्या व सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. असे मत व्यक्त करत असो आतापर्यंत जे झाले ते पुरेसे आहे. परंतु जनतेच्या हितासाठी आम्ही आता गप्प बसणार नसून येत्या निवडणुकांच्या अगोदर पाचोरा शहरातील व शहराला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लावली नाहीत तर आम्ही रस्त्यावर उतरुन शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा एका निवेदनाद्वारे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे दिला आहे.
या निवेदनावर उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख श्री. अरुण पाटील, उपजिल्हाप्रमुख श्री. उध्दव भाऊ मराठे, उपजिल्हाप्रमुख श्री. अभय पाटील, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख श्री. शरद पाटील, पाचोरा शहर युवाधिकारी श्री. संदिप जैन, पाचोरा शहरप्रमुख श्री. अनिल सावंत, शहरप्रमुख श्री. दिपक पाटील, ग्रामीण युवाधिकारी श्री. शशी पाटील यांच्या सह्या आहेत.