कसाऱ्याजवळ पंचवटी एक्सप्रेसची कपलिंग तुटली; काही वेळ रेल्वे वाहतूक खोळंबली

इगतपुरी-
मुंबईकडे जाणाऱ्या मनमाड-नाशिक-मुंबई पंचवटी एक्सप्रेसची अचानक कपलिंग तुटल्याने इंजिन व एक बोगी काही अंतरावर पुढे निघुन गेल्याची घटना आज सकाळच्या सुमारास कसाऱ्याजवळ घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मनमाडहून मुंबईच्या दिशेने जाणारी पंचवटी एक्सप्रेस चे दिनांक 6 जुलै शनिवार रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान कसारा रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर अचानक कपलिंग तुटली. यामुळे इंजिन व एक बोगी मुंबईच्या दिशेने निघुन गेली तर बाकी पंचवटी एक्सप्रेसच्या बोग्या मागे राहिल्या.
दरम्यान, ही बाब चालकाच्या लक्षात येताच चालकाने इंजिन थांबवून पुन्हा इंजिन मागे आणून बाकी बोग्यांना जोडण्यात आले. यानंतर ही एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र, या प्रकारामुळे मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची धावपळ उडाली. तसेच कपलिंग दुरुस्तीनंतर ४० मिनिटांनी पंचवटी एक्स्प्रेस मुंबईकडे मार्गस्थ झाल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेमुळे काही काळ रेल्वेची वाहतुक खोळबंली होती.