जळगाव जिल्हा

उष्णतेच्या लाटेपासून कामगार व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आवाहन

जळगाव-

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार येत्या काही महिन्यांत तापमान सामान्यपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या श्रम व रोजगार मंत्रालय तसेच राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने (NCDC) उष्णतेच्या लाटेपासून कामगार व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.अत्यंत उष्णतेच्या परिस्थितीत कामगार, मजूर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यविषयक धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः बांधकाम कामगार, वीटभट्टी कामगार, रोजंदारी मजूर तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांना उष्माघाताचा अधिक धोका असतो. त्यामुळे जिल्ह्यातील नियोक्ता, उद्योग, बांधकाम कंपन्या तसेच ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांनी तातडीने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कामाचे तास पुन्हा नियोजित करून दुपारच्या तीव्र उष्णतेत काम टाळणे, कामगारांना आवश्यकतेनुसार विश्रांती देणे तसेच कामाचा वेग कमी करण्यास परवानगी देणे आवश्यक आहे. कामगारांसाठी पुरेसे पिण्याचे पाणी, थंडावा मिळेल अशी विश्रांती क्षेत्रे आणि सावलीची व्यवस्था करणे तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी बर्फ पॅक व उष्णता प्रतिबंधक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. याशिवाय आरोग्य विभागाशी समन्वय साधून कामगारांची नियमित आरोग्य तपासणी करणेही आवश्यक आहे.दरम्यान, उन्हाळ्यात विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रामयात्रा, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशा कार्यक्रमांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून आवश्यक उपचार साहित्य उपलब्ध ठेवणे, कार्यक्रमांचे वेळापत्रक उष्णतेच्या उच्चांक काळानुसार बदलण्याची शक्यता तपासणे तसेच नागरिकांसाठी थंडावा मिळेल अशी विश्रांती क्षेत्रे उभारणे आवश्यक आहे. यात्रांमध्ये पुरेसे पिण्याचे पाणी व इलेक्ट्रोलाइट पेय उपलब्ध करून देण्यासह जनजागृतीसाठी घोषणाबाजी, पत्रके व माहिती फलकांचा वापर करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कामगारांचे आरोग्य आणि सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी सर्व संबंधित विभाग, उद्योग व स्थानिक संस्था यांनी समन्वयाने काम करून या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वैशाली चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!