अट्टीवागू नाल्यावरील पुलाचे काम अर्धवट;नागरीकांना दिला आंदोलनाचा इशारा..

सिरोंचा (प्रतिनिधी-मुरलीधर मारगौणी)
सिरोंचा तालुक्यातील टेकडाताल्ला, कंबालपेठा मार्गावरील अट्टीवागू नाल्यावर सुरू असलेल्या पुलाच्या अर्धवट बांधकामामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.मागील तीन वर्षांपूर्वी शासनाकडून या पुलाच्या बांधकामास मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी संबंधित विभाग व कंत्राटदाराकडून कामाला सुरुवात करण्यात आली, मात्र आज पर्यंत पुलाचे काम अपूर्ण अवस्थेतच पडून आहे.या अर्धवट पुलामुळे कंबालपेठा, चेक, पुसुकपल्ली, गोट्टेगुडम, नेमडा, टेकडाताल्ला, जाफ्राबाद, मोकेला, चिक्याला, परसेवाडा, येल्ला, रामन्नापेठा, पापय्यापल्ली, नरसिंहापल्ली, पिरमेडा, चंदाराम, बोगटागुडम, पेडिगुडम यासह जवळपास ३० गावांतील नागरिकांना तालुका मुख्यालयाशी संपर्क साधताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून आरोग्य सेवांवरही मोठा परिणाम होत आहे.नागरिकांनी यापूर्वी अनेकदा प्रशासनाला निवेदने दिली असून विविध वृत्तपत्रांमधून या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले होते.तरी संबंधित विभाग व कंत्राटदाराकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही.पावसाळा जवळ येत असतानाही पुलाचे काम सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.यासंदर्भात नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देत अट्टीवागू पुलाचे रखडलेले काम तात्काळ सुरू करून युद्धपातळीवर पूर्ण करावे, संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.सदरची मागणी पुर्ण न झाल्यास दिनांक 25 मे 2026 रोजी सोमवार पासून सकाळी 11:00 वाजता सिरोंचा तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे. या आंदोलनात परिसरातील ३० गावांतील प्रतिष्ठित नागरिक व सर्वसामान्य जनता सहभागी होणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.यावेळी स्वामी गोदारी,रामकिशटू निलम, सुधाकर पेद्दी व प्रतिष्ठीत नागरिक
व गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.



