अतिवृष्टीची नुकसानभरपाई अद्यापही प्रलंबित; दहीगाव संतच्या शेतकऱ्यांचे महसूल आयुक्तांना निवेदन

पाचोरा-
सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पाचोरा तालुक्यातील दहीगाव संत परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला असतानाही अद्याप शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर दहीगाव संत येथील शेतकरी मनोज पाटील यांनी महसूल आयुक्त, नाशिक विभाग, जितेंद्र वाघ यांना निवेदन देऊन तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.
सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे केले असून त्याचा अहवालही शासनाकडे सादर करण्यात आला आहे. मात्र, नुकसानभरपाईचे अनुदान अद्याप मिळाले नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आगामी सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे अनुदान मिळावे, यासाठी संबंधित लोकप्रतिनिधींनी शासन स्तरावर तातडीने पाठपुरावा करावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळाल्यास त्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.



