तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद प्रकरणी खासदार स्मिताताई वाघ यांची पाहणी; पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना

पाचोरा-
पाचोरा तालुक्यातील तारखेडा परिसरातील रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद प्रकरणी ग्रामस्थांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांची भेट घेऊन आपली समस्या मांडली होती. रेल्वे प्रशासनाकडून शेतकऱ्यांसाठी वापरला जाणारा रस्ता अचानक बंद करण्यात आल्याने नागरिक व शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. या प्रश्नाची गंभीर दखल घेत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी तातडीने खासदार स्मिताताई वाघ यांच्याशी संपर्क साधून सदर समस्या सोडविण्यासाठी सांगितले
यानंतर शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र (राजू दादा) पाटील यांनीही खासदार स्मिताताई वाघ यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून परिसरातील रेल्वे मार्गावरील अडचणी व ग्रामस्थांच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सूचनेनुसार आणि तालुकाप्रमुख राजू दादा पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत खासदार स्मिताताई वाघ यांनी अवघ्या दोन ते तीन दिवसात तारखेडा येथे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
पाहणीदरम्यान खासदार स्मिताताई वाघ यांनी रेल्वे मार्गालगत विविध ठिकाणी जाऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.
ज्या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने अचानक रस्ता बंद केला आहे, त्या ठिकाणी नागरिक व शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी पर्यायी व्यवस्था तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजू दादा पाटील यांनी पाचोरा रेल्वे स्थानकावरील प्रवासी सुविधांमध्ये वाढ करण्याबरोबरच अधिक रेल्वे गाड्यांना थांबा देण्याची मागणी खासदार स्मिताताई वाघ यांच्याकडे केली.
त्यावर खासदार स्मिताताई वाघ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रथम विदर्भ एक्स्प्रेसला पाचोरा येथे थांबा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, तसेच इतर सुविधा व मागण्यांसाठीही टप्प्याटप्प्याने पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले.
या पाहणीवेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे, सुभाष पाटील , नंदू बापू पाटील, गणेश पाटील वाघुळखेडा यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
त्यानंतर खासदार स्मिताताई वाघ यांनी काही दिवसांपूर्वी तारखेडा येथे झालेल्या रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या तालुकाप्रमुख राजू दादा पाटील यांच्या चुलत पुतण्याच्या कुटुंबीयांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक वसंत वाघ, शिवसेना शाखाप्रमुख धनराज पाटील, किशोर पाटील, पंकज पाटील, आनंदा पाटील, निलेश पाटील, विजय पाटील, शरद पाटील आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



